Mumbai Rains : मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला.
मुंबई : ऐन दहीहंडीच्या दिवशी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भरात आला असतानाच पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रभर मुंबई शहर-उपनगरासह परिसरातील ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, वाशी, पनवेल या भागातही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईत एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. रात्री दोन वाजताच्या सुमारास एका घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये सुरेश आणि शालू मिश्रा या बापलेकीचा समावेश आहे, तर मायलेक आरती आणि ऋतुराज मिश्रा जखमी आहेत. याशिवाय आजूबाजूच्या घरातील दोघा जणांनाही दुखापत झाली आहे.
मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच पाचारण करण्यात आले. त्यांनी बचावकार्य हाती घेतले असून चौघा जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आजूबाजूची घरं रिकामी करण्याचे काम सुरु आहे. मुंबई महापालिकेने डोंगर किनाऱ्यावरील भाग धोकादायक असल्यामुळे येथील घरात न राहण्याची नोटीस मिश्रा कुटुंबाला बजावली होती, अशी प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. अनेक भागात पाणी साचले आहे आणि दृश्यमानता कमी झाली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी ‘एक्स’ हँडलवरुन दिली आहे. मुंबईतील रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकलही धिम्या गतीने धावत आहेत.
: मुंबईकरांनी अनावश्यक कारणांसाठी प्रवास टाळावा, गरज असेल, तरच घराबाहेर पडावे आणि काळजी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे. पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस मुंबईकरांना मदत करण्यासाठी सतर्क आणि सज्ज आहेत, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 100, 112 किंवा 103 या क्रमांकावर डायल करा, असं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















