दिव्यात नालेसफाईच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दिवा | प्रतिनिधी
दिवा प्रभाग समिती अंतर्गत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रत्यक्षात नालेसफाई अपुरी ठेवून केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखवली जात असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी फक्त ५० ते ६० फूट नाला साफ करून त्याचे जिओ-टॅगिंग केले जाते आणि फोटो काढून संपूर्ण नाला साफ झाल्याचे दाखवले जात आहे. मात्र उर्वरित नाले गाळ, प्लास्टिक आणि कचऱ्याने भरलेलेच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या संदर्भात संबंधित कंत्राटदार भानुशाली यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी हे देखील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. सहाय्यक आयुक्तांकडूनही या प्रकरणात कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, नालेसफाईसाठी तब्बल २५० कामगार कार्यरत असल्याचा दावा अधिकृत पातळीवर केला जात असला तरी प्रत्यक्षात एवढे कामगार मैदानात दिसत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. “२५० कामगारांचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात २५ कामगार तरी काम करत आहेत का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिव्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी महापालिका प्रशासनाने तात्काळ वास्तव पाहणी करून पारदर्शक अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















