दिवा शहरातील ५१ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे; योगिता नाईक यांची पुन्हा पदनियुक्ती
दिवा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये दिवा शहरातील राजकीय घडामोडींना मोठे वळण मिळाले असून, शहरातील ५१ पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे मागे घेण्यात आले आहेत. पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासामुळे तसेच मातोश्रीकडून संबंधित विषयाची गंभीर दखल घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
दरम्यान, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका मा. सौ. योगिता हेमंत नाईक यांची पुन्हा सन्मानपूर्वक पदनियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दिवा शहरातील शिवसैनिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्वाभिमानाचा सन्मान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शिवसेना पक्ष ही केवळ राजकीय संघटना नसून कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे कुटुंब असल्याची भावना यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पक्षातील निष्ठावंतांना न्याय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्या निर्णयाचे शिवसैनिकांकडून स्वागत करण्यात येत असून, “आज, उद्या आणि सदैव ठाकरे कुटुंबासोबत” अशी भूमिका कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















