कल्याण वालधुनी बुद्धभूमी प्रकरणाने बौद्ध समाजात संतापाची लाट; अन्यायाविरोधात एकजुटीचे आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे निवेदन
कल्याण : कल्याण येथील वालधुनी बुद्धभूमी परिसरात सुरू असलेल्या घडामोडींमुळे बौद्ध समाजामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजाच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
आज ऑल इंडिया पँथर सेना ठाणे जिल्हा युवक व अंबरनाथ शहर कमिटी यांच्या वतीने वालधुनी बुद्धभूमी येथे भेट देत आदरणीय भंते यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बौद्ध भिकूंनी धक्कादायक माहिती देत सांगितले की, स्थानिक राजकीय दबाव आणि पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून बौद्ध भिकूंवर दडपशाही केली जात आहे.
तसेच बुद्ध मूर्ती आणि भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. या घटनेमुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नसून, संविधानिक मूल्यांवर देखील हल्ला झाल्याची भावना समाजामध्ये व्यक्त होत आहे.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, “हा केवळ एका जागेचा प्रश्न नाही, तर बौद्ध समाजाच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. समाजाने आता गप्प बसून चालणार नाही. अन्यायाविरोधात एकजूट करून लढण्याची वेळ आली आहे.”
ऑल इंडिया पँथर सेना ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष तेजस सरवदे यांनी आक्रमक भूमिका घेत समाजाला आवाहन केले की, “बौद्ध समाजाने मतभेद विसरून एकत्र यावे. समाज विकणाऱ्यांपासून सावध राहावे. संघर्ष हा आमचा इतिहास आहे आणि अन्यायाविरोधात लढणे हीच आमची परंपरा आहे.”
दरम्यान, दिनांक 05 जून 2026 रोजी वालधुनी बुद्धभूमी, कल्याण येथे सर्व समाज बांधवांची महत्त्वपूर्ण चर्चा बैठक आयोजित करण्यात आली असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेल्या या प्रकरणामुळे येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















