दिव्यात १२ वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ; बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची समाजसेवक अमोल केंद्रे यांची मागणी
ठाणे | प्रतिनिधी
दिवा शहरातील १२ वर्षीय कु. देवेंद्र आशिष सिंग यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा, अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय आणि चुकीच्या औषधोपचाराचा गंभीर संशय व्यक्त करण्यात येत असून दिवा परिसरातील बोगस डॉक्टर व अनधिकृत मेडिकल व्यवसायाविरोधात व्यापक मोहीम राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात दिवा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अमोल धनराज केंद्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, मुंब्रा पोलीस स्टेशन, ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच अन्न व औषध प्रशासन (FDA) यांना अत्यंत तातडीचे निवेदन सादर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कु. देवेंद्र आशिष सिंग (वय १२) या मुलास दिवा परिसरातील एका कथित “बंगाली डॉक्टर” कडून औषध देण्यात आले होते. औषध दिल्यानंतर काही मिनिटांतच मुलाची प्रकृती गंभीर बिघडली. त्याला बेशुद्धावस्था आली तसेच हात-पाय वाकडे झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला डोंबिवली येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने पुढे मुंबईतील KEM रुग्णालयात हलविण्यात आले. तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर दिनांक १ जून २०२६ रोजी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर दिवा परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, नोंदणी व कायदेशीर परवाने होते का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधिताने नेमके कोणते औषध दिले, ते कोणत्या मेडिकलमधून आणण्यात आले आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध देण्यात आले होते का, याचीही तपासणी व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे संबंधित कथित डॉक्टर हा कोणत्याही अधिकृत दवाखान्याऐवजी एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये बसून उपचार करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर तो गावाकडे पळून गेल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित जागामालक, कार्यालय चालक आणि इमारत मालक यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
“देवेंद्र या निष्पाप बालकाचा जीव गेला, पण भविष्यात अशा बोगस उपचारांमुळे आणखी कोणाचा जीव जाऊ नये,” अशी तीव्र भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दिवा शहरातील सर्व संशयित क्लिनिक, अनधिकृत दवाखाने आणि परवान्याविना चालणाऱ्या मेडिकल स्टोअर्सवर संयुक्त तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS), राष्ट्रीय वैद्यकीय आयोग अधिनियम आणि औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणामुळे दिवा शहरातील आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















