*निवडून येताच वर्षभरात दिव्यातील ‘पाणी’ आणि ‘हॉस्पिटल’चा प्रश्न मार्गी लावणार; दिवा शहरात शिवसेना ठाकरे गटाचे ॲड.रोहिदास मुंडे,ज्योती पाटील व योगेश निकम यांचा ‘मास्टरस्ट्रोक’*
तातडीने हॉस्पिटल सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून अद्यावत हॉस्पिटल सुरू करणार, तर पाणी प्रश्नासाठी योग्य नियोजन करणार असल्याची गॅरंटी
*दिवा:* ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विकासाचा मोठा अजेंडा मांडत मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडून आल्यास पहिल्याच वर्षात दिव्याचा पाणी प्रश्न कायमचा निकालात काढणार आणि शहरात सुसज्ज हॉस्पिटल सुरू करणार, अशी मोठी ‘गॅरंटी’ उमेदवारांनी दिली आहे.
*पाणी प्रश्नावर ठोस नियोजन*
दिव्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न हा येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रभाग २८ मधील उमेदवार योगेश गौतम निकम ,ज्योती राजकांत पाटील आणि ॲड.रोहिदास बामा मुंडे यांनी यावर ठाम आश्वासन दिले आहे की, पहिल्या वर्षाच्या आत प्रत्येकाला पुरेसे आणि दररोज पाणी मिळेल याचे नियोजन केले जाईल. यासाठी साठवण टाक्यांचे जाळे निर्माण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जाणार आहे.
*आरोग्य सेवेसाठी हॉस्पिटलची गॅरंटी*
पाण्यासोबतच दिव्यातील आरोग्य सुविधेचा अभाव दूर करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने पुढाकार घेतला आहे. तातडीची गरज म्हणून भाडेतत्त्वावर जागा घेऊन तातडीने हॉस्पिटल सुरू करण्याचे वचन देण्यात आले आहे. यामध्ये:
लहान मुलांसाठी विशेष कक्ष.
गरोदर माता-भगिनींसाठी स्वतंत्र विभाग. अतिदक्षता विभाग (ICU) ची सुविधा.
*राजकीय वर्तुळात ‘मास्टरस्ट्रोक’ची चर्चा*
दिव्यातील प्रलंबित प्रश्नांवर थेट ‘टाइमबाउंड’ गॅरंटी दिल्याने हा शिवसेना ठाकरे गटाचा मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ मानला जात आहे.
“दिवा शहरात जे आजवर कोणाला जमले नाही, ते आम्ही करून दाखवू,” असा विश्वास उमेदवार ज्योती पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही काम करत असून दिलेला शब्द पाळण्याची शिवसेनेची रीत आहे. जे काम होणार आहे तेच आम्ही सांगत आहोत असे रोहिदास मुंडे,योगेश निकम यांनी म्हटले आहे. वर्षभराच्या आत हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिल्याने सध्या संपूर्ण दिवा शहरात याच विषयाची चर्चा रंगली आहे.
या प्रभागातून योगेश गौतम निकम (२८ अ), ज्योती राजकांत पाटील (२८ ब) आणि ॲड.रोहिदास बामा मुंडे (२८ ड) हे ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















