उद्धव–राज युतीनंतर महायुती अॅक्शन मोडमध्ये, ठाण्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब, मुंबईत काय?
ठाणे :- एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर दुसरीकडे आता महायुतीच्या गोटातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मुंबई महापालिकांच्या जागा वाटपांची चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे ठाण्यात मात्र युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा मॅरेथॉन बैठक पार पडली. पहाटेपर्यंत चाललेल्या या बैठकीत महायुतीने महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना–भाजप युतीचा बहुचर्चित फॉर्म्युला अखेर निश्चित झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात पहाटे चार वाजेपर्यंत सविस्तर चर्चा पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक झाली.
*ठाण्यात भाजपकडून किती जागांची मागणी?*
या बैठकीत ठाणे महापालिकेतील जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यात आला. भाजपकडून सुरुवातीला ५५ जागांची मागणी करण्यात आली होती. त्यावर शिवसेनेकडून सकारात्मक भूमिका घेत भाजपला ४० ते ४५ जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली. दीर्घ चर्चेनंतर दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधत अंतिम फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे.
*जागा वाटपाचा फॉर्म्युला काय?*
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे महापालिकेसाठी शिवसेना ८१ जागांवर निवडणूक लढवणार असून भाजप ४५ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित पाच जागा मित्र पक्षांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ठाण्यात या जागावाटपाबाबतची अधिकृत घोषणा येत्या २-३ दिवसात करण्यात येण्याची शक्यता आहे. पहाटेपर्यंत चाललेल्या या बैठकीमुळे ठाणे महापालिका निवडणुकीच्या रणनितीला वेग आला असून, महायुतीतील समन्वय अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















