Manoj Jarange Patil Maratha Morcha: किरकोळ कारणावरुन जरांगे समर्थकांना पनवेलमध्ये बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. कार घासली नेमकं काय घडलं?
नवी मुंबई : मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू केलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुण्याहून पिकअप टेम्पो घेऊन मुंबईत जाणाऱ्या मराठा तरुणांना आठ ते दहा जणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी पनवेलमध्ये घडली. या मारहाणीत पाच मराठा तरुण जखमी झाले आहेत. पनवेल शहर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यापैकी पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच, इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील काही मराठा तरुण रविवारी दुपारी पिकअप वाहनाने जुन्या मुंबई–पुणे मुंबई महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात होते. ही गाडी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास पनवेलमधील डेरवली पुलाच्या जवळ आली असताना, त्यापुढील लाल रंगाच्या कारला घासली गेली. यावरून कारचालक आणि मराठा तरुणांमध्ये वाद होऊन भांडण झाले व त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. या गोष्टीचा राग मनात राग धरून कारचालकाने फोन करून त्याच्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी कारचालकाने जेएनपीटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टी पॉइंटच्या पुढे पुष्पकनगर समोरील पहिल्या पुलाजवळ मराठा तरुणांचे वाहन अडवले.
त्यानंतर आरोपी कारचालक व त्याच्या साथीदारांनी चंद्रकांत बाबाजी थोरांधळे, शाम बबन केमगिरे, गणेश ज्ञानेश्वर मिंडे, रामदास पिंगळे, सुधाकर ढवळे या तरुणांना हाताबुक्क्यांनी तसेच, टिकावच्या लाकडी दांडक्याने व फायबर काठीने मारहाण करून जखमी केले. जखमी तरुणांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून देत, गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यापैकी पाच जणांना अटक केली.
गोंधळ करायचा तर परत जा- जरांगे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी उपोषण करतोय. मला वेदना होत आहेत, आझाद मैदान सोडून बाहेर कुणीही आंदोलक बाहेर फिरणार नाही, ज्यांना गोंधळ घालायचा आहे त्यांनी परत गावी निघून जा’, असा दम मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी आंदोलकांना दिला.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















