दिव्यातील नागरिकांच्या जीवाशी कोण खेळत आहॆ साबेगाव येथे सीलबंद पाण्याच्या बाटलीत आढळला साप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. प्रशासनाचा कानाडोळा.
ठाणे दिवा : पिण्यासाठी विकत आणलेल्या २० लिटरच्या सीलबंद पाण्याच्या बाटलीत (जारमध्ये) चक्क एक साप आढळल्याची अत्यंत धक्कादायक आणि भयंकर घटना दिव्यातील साबेगाव परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागरिकांचे आरोग्य अक्षरशः वाऱ्यावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, ‘शुद्ध पाणी’ पुरवठा करणाऱ्या स्थानिक कंपन्यांच्या स्वच्छतेवर आणि कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या दिवा परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर २० लिटरच्या जारवर अवलंबून असतात. ‘मिनरल वॉटर’ किंवा ‘आरओ (RO) वॉटर’ च्या नावाखाली हे सीलबंद जार विकत घेतले जातात. मात्र, साबेगावमध्ये एका ग्राहकाला आलेल्या पाण्याच्या सीलबंद जारमध्ये चक्क साप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने, जार पारदर्शक असल्यामुळे पाण्याचा वापर करण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आला आणि मोठा अनर्थ टळला. जर हे पाणी कोणाच्याही नकळत पिण्यात आले असते, तर विषबाधा होऊन जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असता.
या घटनेचे फोटो समोर आले असून, जारच्या आतमध्ये साप स्पष्टपणे दिसत आहे. सीलबंद बाटलीत साप गेलाच कसा? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. यावरून स्थानिक पाणी शुद्धीकरण केंद्रांवर (RO Plants) प्रशासनाचे कसलेही नियंत्रण नसल्याचे आणि तिथे स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट होते. दिव्यात अनेक ठिकाणी कोणतीही परवानगी नसलेले अनधिकृत पाणी प्रकल्प सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही आल्या आहेत, त्याला या घटनेने पुष्टी मिळाली आहे.
*या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे:*
* घरपोच येणारे पाण्याचे जार स्वीकारण्यापूर्वी ते स्वच्छ असल्याची आणि त्यात कोणताही कचरा किंवा जीव-जंतू नसल्याची खात्री करून घ्या.
* जार पारदर्शक असल्याने उजेडात बाहेरून नीट तपासून मगच त्याचे सील उघडा.
* लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेता, शक्य असल्यास पाणी उकळून आणि गाळूनच पिण्यासाठी वापरा.
या घटनेची दखल घेत ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिवा शहर व आसपासच्या परिसरातील सर्व पाणी शुद्धीकरण केंद्रांची तातडीने तपासणी करावी. नागरिकांच्या जीवाशी असा जीवघेणा खेळ करणाऱ्या आणि अस्वच्छता बाळगणाऱ्या पाणी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावेत, अशी जोरदार मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

मुख्य संपादक: संदीप जाधव
























