दिव्यात शिवसेना ठाकरे गटाचे ‘गटर पूजन’ आंदोलन नालेसफाईच्या रखडलेल्या कामांवरून महापालिका प्रशासनाविरोधात संताप
ठाणे | प्रतिनिधी
पावसाळा तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईची कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ आणि निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दिव्यात अनोखे ‘गटर पूजन’ आंदोलन करण्यात आले.
कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत व कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे आणि दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
दिवा परिसरातील अनेक नाले आणि गटारांची सफाई अद्याप अर्धवट अवस्थेत असून, अनेक ठिकाणी गाळ आणि कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे मुसळधार पावसात शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांना जलतरणाचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, दिवा शहरातील नालेसफाईसाठी सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित दर्जाची कामे झालेली नसल्याचा गंभीर आरोप शिवसैनिकांनी यावेळी केला. “नालेसफाईच्या नावाखाली केवळ कागदी कामे दाखवून निधी खर्च केला जात आहे. प्रत्यक्षात नागरिक मात्र पावसाळ्यातील संकटाच्या छायेत जगत आहेत,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी शिवसैनिकांनी प्रतिकात्मक ‘गटर पूजन’ करून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवला. तसेच तातडीने सर्व नाले आणि गटारांची संपूर्ण साफसफाई करून दिवा शहराला पूरस्थितीपासून वाचवावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत, जिल्हा सचिव भैय्यासाहेब पाटील, उपजिल्हाप्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका योगिता नाईक, शहरप्रमुख सचिन पाटील, उपशहरप्रमुख मारुती पटेलकर, विभागप्रमुख योगेश निकम, संजय जाधव, संतोष कदम, उमेश भानसे, शशिकांत कुंभारगण, विलास उतेकर, तुषार सावंत यांच्यासह उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

मुख्य संपादक: संदीप जाधव





















